मशिद, दर्गा आणि इमामवाडा

विविध धर्म-जाती-पेशे आणि संस्कृतींना जोपासणारा आपला देश खरंतर मंदिरांचा देश म्हणायला हवा!
रस्त्यावरून जाताना चटकन नजरेत भरणारं कोणतंही मंदिर आपल्याला विशिष्ट समूहांचा प्रभाव ठळकपणे दर्शवतं. तसंच ते त्या त्या भागातल्या धार्मिक पर्यटनातही मोलाची भूमिका बजावत असतं…
अशावेळी कधीतरी दुसऱ्या धर्माबद्दल सहज नवल वाटलं तर स्वतःला कुठल्या ‘इजम’ च्या चौकटीत बसवायची गरजच काय!!?

आज ‘जुम्मे कि रात’पासून ते ‘कून फाया कून’पर्यंत, निरनिराळ्या माध्यमातून, सणावारांतून आणि दूरवरून कानांवर पडणाऱ्या अजानच्या बुलाव्यातून इस्लाम धर्माच्या खुणा अनुभवायला मिळतायत… बारीक कोरीव नक्षीकाम, कोरलेल्या रेखीव पर्शियन ओळी, बलाढ्य दरवाजे, मिनार, घुमट, कारंजी, महाल ते थडग्यांपर्यंत, मुघलांच्या वर्चस्वादरम्यान बांधलेल्या वास्तू वारसा स्थळांत जपल्या जातायत…


म्हणून, धार्मिक तेढीपलीकडे जात श्रद्धास्थानं म्हणून इस्लामिक प्रार्थन स्थळांकडं नजर फिरवूयात….

मिनार

नवीन भूमी जिंकली कि आपल्या सावभौमत्वाची ओळख करून देण्यासाठी आणि धर्माचा प्रसार करत मुल्ला-मौलवींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मुघल राज्यकर्त्यांनी मोठमोठ्या मशिदींची स्थापना केली.
मशीद म्हणजे मुसलमानांचं प्रार्थनास्थळ.
प्रेषित मुहम्मदाचं घर ही सगळ्यात पहिली मशिद समजली जाते.
आपला देश सर्वाधिक मशिदींचा नॉनइस्लामिक देश म्हणूनही गणला जात असल्याचा सर्व्हे आहे.

मिनार मशिद मुहम्मद अली रोड, मुंबई.


कुठल्याच चिन्ह, मूर्ती, चित्रांच्या स्वरूपात इथे अल्ल्लाह दिसत नाही.
वेगवेगळ्या अरबी स्थापत्याचा अनोखा मेळ साधणाऱ्या मशिदींच्या सभागृह रचनेत (इवान) मध्यभागी असलेला डोम (घुमट) स्वर्गाचं प्रतीक दर्शवतो.
जिथं बघून मुस्लिम नमाज पठण करतात ती ‘किबला’ दिशा दाखवणारी भिंत (मिहरब), देवाला साद घालण्यासाठी या असा बुलावा देण्यासाठी (अजान) बांधलेल्या उंचच उंच ‘मिनार ‘

ते स्त्रियांसाठीची ‘मखफिल’ नामक स्वतंत्र खोली यात असतात.
शुक्रवारच्या महत्त्वाच्या प्रार्थनेसाठी एकच प्रमुख मशिद असते जिला ‘जामा म्हणतात.

जामा ईदगाह


आणि अशाच जामा मशिदीच्या परिसरात ईद वेळी शेकडोंच्या समूहाला पठण करता यावं म्हणून जो ऐसपैस आवार असतो त्याला ‘ईदगाह’ संबोधतात.
कित्येकदा इस्लाम अंतर्गत मोडणाऱ्या विविध शाखांसाठी स्वतंत्र मशिदीही बांधलेल्या दिसतात.

हाजी अली दर्गा, मुंबई

सुफी परंपरेत ख्याती मिळवलेल्या संतांच्या देवस्थानाला ‘दर्गा’ म्हणतात.
संत परंपरेला आणि मनुष्यरूपी पूजनाला इस्लाम धर्मात स्थान नसल्यानं दर्ग्यापाशीच मशीद असं चित्र दिसत नाही.
गायन-नर्तनाच्या माध्यमातून कव्वाल्यां, संतांच्या पालखीच्या यात्रांचं आयोजन करत दर्गा शांतता-मानवतावादाचा प्रसार करतात.

‘सुन्नी’ पाठोपाठ ‘शिया’ या इस्लामिक शाखेचा विस्तार होऊ लागल्यावर आपल्या देशात इमामवाड्यांची निर्मिती झाली. धर्मासाठी कर्बाळाच्या

युद्धात बलिदान देणाऱ्या इस्लामचा तिसरा इमाम हुसेनच्या स्मरणार्थ मुहर्रम वेळी इथे दुखवटा व्यक्त करतात. लखनऊ शहरातला भूलभुलैया नावाने ओळखला जाणारा ‘बडा इमामवाडा’ थक्क करून सोडतो!

पधारो म्हारे केरळा!

घूमर नृत्याची पेशकश

कोणत्याही नव्या प्रदेशाला भेट दिली कि तिथलं निसर्गसौंदर्य, तिथल्या खाण्याच्या विविध व्हरायटीज आणि तिथल्या शॉपिंगच्या गल्ल्या सोडल्या तर पर्यटक फारसे कुठे रमताना दिसत नाहीत.
पण जर तुम्हाला स्थानिक कलाकृती आणि पारंपरिक लोक कलांबद्दल आस्था असेल तर तुमच्या भटकंतीदरम्यान त्यांचा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे?
तर अशीच ही दोन ठिकाणं, जिथल्या मातीतले कलाविष्कार आपण आपल्या ‘ट्रिप’ दरम्यान अनुभवून आपली सफर आणखीन यादगार करू शकतो….

.

गवरी नृत्य

.

धरोहर फोक डान्स : उदयपूर, राजस्थान
बागोर कि हवेली

‘पद्मावत’ सिनेमात दीपिकाने ‘घुमर’वर धरलेला ताल असेल किंवा मामे खानचं ‘कोक स्टुडिओतलं’ ‘चौधरी’ गाणं असेल, आजवर विविध माध्यमातून राजस्थानी कला आपल्याला भुरळ घालत आली.
पण हवेलीतल्या ‘इंटिमेट’ वातावरणात, देश-विदेशातल्या पर्यटकांच्या सान्निध्यात बसून एकाच वेळी राजस्थानी कलाविष्काराची सफर करणं, हा अनुभव खरंच जगात भारी आहे!

कठपुतळ्यांचा पपेट शो

‘धरोहर’ म्हणजे वारसा.
या कार्यक्रमातून भिल्ल जमातीतल्या आदिवास्यांनी येऊन अंबादेवीचा भीमवळ राक्षसावर मिळवलेला विजय त्यांच्या ‘गवरी’ नृत्य-नाट्यातून पाहायला मिळतो. संध्याकाळच्या संधीप्रकाशात गुज्जर व सैनी समुदायाच्या नर्तिकांचं ‘चवरी’ नृत्य डोळ्यांना खऱ्या अर्थानं दिपवतं! यात प्रज्वलित केलेली माती व पितळेची भांडी डोक्यावर तोलत नर्तिका मोहक हालचाली करतात.
कमर आदिवासी जमातीच्या महिलांनी शरीरावर ‘मंजिरा’ (टाळ वाद्य) बांधून त्यातून निर्माण केलेली १३ पद्धतीच्या ध्वनीनादांची प्रस्तुती ‘तेरा ताली’ नृत्यप्रकारातून ऐकणंही सुखावह अनुभव असतो.
चेहऱ्यावर घुंगट (पदर), हातांच्या नाजूक रेखीव हालचाली आणि रंगीबेरंगी लेहेंग्याचा गोलाकार घेर करत एकमेकींभोवती धरलेला फेर ‘घूमर’ नृत्याद्वारे नर्तिका सादर करतात.
भट जमातीच्या वांशिक परंपरेतून राजस्थानच्या मनोरंजन विश्वात मोलाची भर घालणारा कठपुतळ्यांचा पपेट शो तर कार्यक्रमाला निराळीच उंची मिळवून देतो.

भवई नृत्य

‘धरोहर’च्या शेवटी वाळवंटातून दूरवर प्रवास करत पाणी आणायला निघालेल्या महिलांचा उत्सव ‘भवई‘ नृत्यातून बघायला मिळतो. यात नर्तिकांनी डोक्यावर एकामागून एक मातीचे तब्बल ९ घडे रचून ठेवलेले असताना देखील ते पेलवत, क्रमाक्रमाने वाढवत नेलेला हालचालींचा वेग

पाहताना आपण थक्क होऊन जातो!
त्यामुळे तुमच्या राजस्थान भटकंतीत; सारंगी, ढोलक, नगाडे आणि पेटीच्या वाद्यांवर सादर होणारी सुरेल सांगीतिक पेशकश आणि राजस्थानी संस्कृतीची झलक अनुभवायला उदयपूरमधल्या ‘धरोहर फोक डान्स’ कार्यक्रमाला जाणं चुकवू नका.

.

कडथनडन कलरी अँड नवरस कथकली सेंटर : केरळ.

थेक्कडी (पेरियार नॅशनल पार्क जवळ)

कथकली

हाऊसबोट्स, हत्ती आणि हवा तेवढा चहा म्हंटलं कि लगेच पावलं आपल्या ‘गॉड्स ओन कंट्रीकडे’ वळतात! निसर्गसौंदर्याबरोबरच ‘कथकली’, ‘मोहिनीअट्टम’ हे नृत्यप्रकार आणि ‘कलरीपयट्टू’ या मार्शल आर्ट पद्धतीचे उगमस्थळ म्हणून केरळची ख्याती सर्वदूर आहेच.
केरळ दौऱ्यावर असताना एकाच ठिकाणी यातले दोन अविष्कार अनुभवण्याची संधी आपल्याला ‘कडथनडन कलरी अँड नवरस कथकली सेंटर’ मध्ये मिळते.
पेरियार नॅशनल पार्क जवळ वसलेल्या थेक्कडी गावात हे सेंटर आहे.

‘कुझी’ म्हणजे खड्डा. सादरीकरणाच्या खोलीत, मधल्या भागात प्रात्यक्षिकांसाठी खणलेला मातीचा खड्डा आणि त्याच्या चहूबाजूंनी बसण्याची रचना या ‘कुझिकलरी’ पद्धतीने आपण कलरीपयट्टू बघू शकतो.
‘कलरी’ म्हणजे युद्धभूमी आणि ‘पयट्टू’ म्हणजे सराव.
पहिली मार्शल आर्ट्स विद्या म्हणून ख्याती असलेला हा तन-मन-शरीराच्या एकाग्रतेचा कस लावणारा कलाप्रकार चित्तथरारक हालचालींनी आपल्याला बसल्या जागी खिळवून ठेवतो.
शंकराने परशुरामाला शिकवलेल्या या विद्येमागे वेदिक-पौराणिक पार्श्वभूमीही आढळते.
कलरीपयट्टू ही युद्धक्षेत्राची रणनीती नसून हे समोरच्या शत्रूपासून सावध राहत त्याला घायाळ न करता शिताफीने त्याच्यावर वार करायचं- स्वसंरक्षणाचं तंत्र आहे.
यात कायिक हालचालींबरोबर तलवारी, भाले, खंजीर आदी शस्त्रांचा वापर होतो.

भडक हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाच्या छटा वापरून मुखवट्यावजा केलेला मेकअप, डोक्यावर चढवलेला आणि विशिष्ट पौराणिक देव-दानवाला साजेलसा प्रचंड मुकुट, भरजरी आणि पायघोळ वेशभूषा आणि डोळे विस्फारून; हस्तमुद्रा आणि पदलालित्याची सांगड घालत नर्तकाने केलेले अर्थपूर्ण  कथन म्हणजे ‘कथकली‘. केरळपलीकडे कथकली नृत्यप्रकार प्रचलित नसला तरी केरळला गेल्यावर त्याची अनुभूती घेणं हे अनिवार्यच समजा! बहुतांशी पुरुष नर्तक सादर करत असणाऱ्या या नर्तनात त्याची पूर्वतयारी पाहण्याची सोयही या सेंटर मध्ये उपल्बध आहे. 

बगाड बघितलंत का?

फोटो- रणवीर पोळ

आम्ही अंबेचे गोंधळीssss
झांझ-संबळ-तुणतुण्याच्या तालावर निनादत निघालेली गावच्या जत्रेची मिरवणूक… बैल गाडीला जुंपलेल्या दगडी चाकाच्या रथावर; उभारलेला लाकडाचा उंचच उंच खांब आणि त्यावरच्या आडव्या फळीच्या एका टोकाला फुलं-पताकांच्या दाटीवाटीत जीव मुठीत धरून लटकलेला संजय नार्वेकर!
‘अगं बाई अरेच्या!’ या धम्माल सिनेमातलं हे दृश्य पाहताना त्याची दया तर येतेच पण राहून राहून प्रश्न पडतो कि ही नेमकी भानगड आहे तरी काय…?!

सिनेमातील दृश्य


तर हा आहे शैव परंपरेतला शेकडो वर्षांची परंपरा असणारा नवस फेडण्याचा ग्रामीण उत्सव.
नवस बोललेल्या कुटुंबातल्या सदस्यानी अक्षरशः स्वतःचा जीव टांगणीला लावायचा आणि गावातून मंदिरापर्यंत बैलगतीनं मानाचं स्थान मिरवायचं अशा या गंमतशीर मिरवणुकीला ‘बगाड’ म्हणतात.
गावच्या वेशीपासून वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत रथ उभा करून, सी-सॉवजा असणाऱ्या या खांबाचे दुसरे टोक गरागरा फिरवून बगाडस्वाराला रथाची प्रदक्षिणा करवतानाच्या प्रसंगाला तर बघ्यांची विशेष गर्दी जमते.

फोटो- सुमित कांबळे

चैत्र पौर्णिमा-रंगपंचमीचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी-कष्टकरी वर्गात भरणाऱ्या बगाडाच्या जत्रेला मोठ्या दिमाखाचा मान आहे.
इतरत्र देशभरात झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आंध्रप्रदेश या राज्यांत ‘चरक पूजा’, ‘सिरीमनू’, ‘नील पूजा’ या नावांनी हा उत्सव साजरा केला जातो.

सिरीमनू उत्सव

बगाड निघणार म्हंटल्यावर त्या मिरवणुकीत नाचायला, रात्रभर मंदिरात चालणाऱ्या अभंग-टाळवादनात, देवाच्या गजरात तल्लीन व्हायला आलेल्या गावकऱ्यांचा हुरूप या उत्सवानंतर द्विगुणित झालेला दिसतो.
साताऱ्यात भरणारी बावधानची बगाड यात्राही प्रसिद्ध आहे.

उत्सवाची पाळंमुळं


चरक अर्थात चक्र हे सूर्याचं प्रतीकात्मक रूप. ना फांद्या ना मुळं, २०-३० फूट लांबच लांब बुंधा असणारं चरकाचं झाड हे शिव-शक्तीचं (अर्धनारीश्वराचं) निवासस्थान समजलं जातं.


वेदिक काळात चैत्र पौर्णिमेला इंद्रदेवाने शंकराची पूजा केल्याचे संदर्भ आढळतात.
या परंपरेचा मान राखत, शंकर आणि पार्वतीला म्हणजेच ‘पुरुष-प्रकृतीला’ समर्पित करण्यासाठी हे मानवरूपी चक्र फिरवून यज्ञ केला जातो. याद्वारे सूर्य आणि पृथ्वीचं मिलन घडवून आणत शेतकरी सुगीची कामना करतात.

या सर्व प्रतीकांचा विचार करता ही पूजा नेमकी कशी आणि केंव्हा सुरु झाली याचा मात्र थांग लागत नाही. पश्चिम बंगाल मध्ये लटकणाऱ्यांच्या पाठीतल्या त्वचेत लोखंडाने टोचून त्यांना त्या खांबाभोवती फिरवले जाई. ही घातक प्रथा ब्रिटिशांनी १८६० च्या दरम्यान बंद पाडल्याचे दाखले उत्सवाचे ब्रिटिशकालीन अस्तित्व समोर आणतात. यांनतर दोरखंडाने बांधून लटकवण्याची रीत सुरु झाली.

महाराष्ट्रात बैलगाडीच्या रथावर हे लाकडाचे चक्र उभारून त्यावर दोरीचा सजवलेला पाळणा नवसकर्त्यासाठी केला जातो. बैलांच्या निवडीपासून ते निवडलेल्या झाडाचे लाकूड तासून त्याची पूजा करेपर्यंत, महिनाभरापासून बगाडाची लगबग गावात सुरु होते.
गावातल्या ज्या कुटुंबाचा नवस आहे किंवा फेडला गेलाय; ते मानाचं कुटुंब पिढ्यानपिढ्या बगाडात सामील होतं. जे लटकवले जातात त्यांना ‘शेलकरी’ संबोधतात तर जे रथात उभे राहून येतात त्यांना ‘वीर’.

देवीच्या जत्रेतलं बगाड असलं तरी त्यात स्त्रिया उभ्या राहत नाहीत. रस्त्यात गोमूत्र शिंपडत, वाजत गाजत निघालेली ही मिरवणूक मानाच्या मंदिरात पोहोचल्यानंतर देवाला दंडवत घालण्यासाठी, मीठ-मिरचीचं ताट देवाला वाहण्यासाठी बगाडातल्या वीरांच्या पत्नी-माता सहभागी होतात.
ग्रामीण महाराष्ट्रात अजूनही पाळी दरम्यान महिलांनी देवाच्या कामात सहभागी होऊ नये हा विचार असल्यानं, बगाडाच्या वेळी जर शिवा-शिवी झाली तर बैल परत मागे फिरवण्याची वेळही स्थानिकांनी आणली आहे.

जुन्नर जवळील पारुंडे गावातल्या ब्रह्मनाथ मंदिराच्या बगाडाचं हे टिपलेलं दृश्य. ‘काशीची दुसरी गादी’ म्हणून मान असलेलं हे देवालय नाशिकच्या कुंभ मेळ्यावेळी भाविकांच आश्रयस्थान असतं.

Design a site like this with WordPress.com
Get started